Thursday, February 26 2026 | 04:47:50 AM
Breaking News

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी “टुगेदर अगेंस्ट एचपीव्ही ” परिषदेमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा सामना करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांचे केले समर्थन

Connect us on:

भारताने विकसित केलेली गर्भाशय  मुखाच्या कर्करोगावरील लस परवडणारी आणि अधिक प्रभावी आहे असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

कोविड महामारीच्या काळात मिशन “सुरक्षा” सुरु केल्याबद्दल तसेच सरकारच्या लसीकरण कार्यक्रमाला ठामपणे पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानताना, सिंह यांनी मानवी पॅपिलोमा व्हायरस (HPV) प्रतिबंधक लस विकसित केल्याबद्दल विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातील जैवतंत्रज्ञान विभागाची प्रशंसा केली. ही लस वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण ती HPV 6,11 आणि 16,18 या चार प्रकारच्या विषाणूंवर अत्यंत प्रभावी आहे जे महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी संबंधित आहेत.

नवी दिल्ली येथे हॉटेल हयात येथे एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीद्वारे आयोजित आरोग्य परिषदेत एका विशेष मुलाखत सत्रात डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, चार प्रकारच्या विषाणूंवर प्रभावी ही  एचपीव्ही लस भारतीय लोकसंख्येसाठी वरदान आहे,  जिथे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे महिलांच्या मृत्यूचे प्रमाण दरवर्षी सुमारे 1 लाख आहे आणि 90 % पेक्षा जास्त  महिलांना एचपीव्ही संसर्गाचा इतिहास असल्याचे आढळले  आहे. एचपीव्ही लसीच्या वापराचे जोरदार समर्थन करताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी दोन-डोस आणि 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींसाठी तीन डोसची शिफारस केली असून लसीचे  सेवन करणे सोपे आहे.

“टूगेदर अगेन्स्ट एचपीव्ही” कॉन्क्लेव्हमध्ये डॉ जितेंद्र सिंह यांनी त्यांच्या भाषणात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, महिलांचे आरोग्य आणि स्वदेशी लसीच्या विकासातील भारताच्या प्रगतीकडे लक्ष वेधले. हा कार्यक्रम गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्धच्या राष्ट्रीय लढ्यावर केंद्रित होता, जे  एक महत्त्वपूर्ण आरोग्य विषयक आव्हान आहे.

सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्याचे आवाहन करताना सिंह यांनी एक मजबूत आरोग्यसेवा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रे, स्वयंसेवी संस्था आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश असलेल्या एकत्रित दृष्टिकोनाच्या महत्त्वावर भर दिला. महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला राष्ट्रीय प्राधान्य असल्याचे अधोरेखित करत 2047 साठीचे भारताचे स्वप्न साकार करण्याच्या केंद्रस्थानी महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देणे आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

विशेषतः ग्रामीण भागात, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासारख्या आजारांकडे निषिद्ध आणि कलंक असल्याच्या दृष्टीने पाहिले जाते  ही समस्या  हाताळण्याची गरज अधोरेखित करत डॉ. जितेंद्र सिंह यांनी लवकर निदान , जागरूकता मोहिमा आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा वितरण प्रणालीचे समर्थन केले. लस आणि वैद्यकीय तंत्रज्ञानातील देशाच्या यशोगाथा जागतिक मापदंड बनल्या आहेत असे सांगून त्यांनी विज्ञान आणि आरोग्य सेवेतील जागतिक नेतृत्व  म्हणून भारताच्या वाढत्या प्रतिष्ठेकडे लक्ष वेधले. भारत केवळ जगाच्या बरोबरीने पाऊल टाकत नाही तर अनेकदा त्याचे नेतृत्व करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

About Matribhumi Samachar

Check Also

एडीएद्वारे आयोजित दोन दिवसीय ‘एअरोनॉटिक्स 2047’राष्ट्रीय चर्चासत्राला बंगळुरुमध्ये प्रारंभ

एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) द्वारे आयोजित ‘एअरोनॉटिक्स 2047’या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला  बंगळुरूच्या सेंटर फॉर एअरबोर्न …