Monday, January 12 2026 | 07:18:06 PM
Breaking News

व्यापार करारासंदर्भात पंतप्रधानांनी घेतलेल्या ठोस भूमिकेबद्दल शेतकरी कृतज्ञ

Connect us on:

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2025

मोठ्या संख्येने आज शेतकरी संघटनांचे प्रमुख आणि देशातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकरी बंधू आणि भगिनींनी  केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या ठोस निर्णयाचे स्वागत करत आभार मानले. नवी दिल्लीतील पुसा संकुल स्थित  सुब्रहमण्यम हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्य मंत्री  भागीरथ चौधरी, कृषि सचिव देवेश चतुर्वेदी, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. एम. एल. जाट यांच्यासह विविध राज्यांच्या शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते.

  

याप्रसंगी सर्वप्रथम देशभरातून आलेल्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी संबोधित करताना एका सुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारप्रति कृतज्ञता व्यक्त केली आणि शेतकरी हिताचे ऐतिहासिक पाऊल उचलल्याबद्दल आभार मानले.

भारतीय किसान संघाचे  हरपाल सिंह डागर, धर्मेंद्र मलिक,  धर्मेंद्र चौधरी, विरेंद्र लोहान, किरपा सिंह नत्थूवाला,  कुलदीप सिंह बाजिदपुर, बाबा राजेंद्र सिंह मलिक,  तरूणेश शर्मा, के पी सिंह ठैनुआ, आचार्य रामगोपाल वालिया,  विनोद आनंद,  राजकुमार बालियान,  विनोद आनंद, अशोक बालियान, विपिचंद्र आर. पटेल, रामपाल जाट,  कृष्णवीर चौधरी, भूपेंद्र सिंह मान,  के. साई रेड्डी यांनी यावेळी संबोधित करत  पंतप्रधानांच्या निर्णयाप्रति आभार मानले.

भारतीय किसान चौधरी चरण सिंह संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धर्मेंन्द्र चौधरी म्हणाले की “पंतप्रधान नरेन्द्र मोदी  यांनी देशातील शेतकरी, पशुपालक आणि मच्छिमारांच्या हिताचा विचार करत अतूट संकल्प असलेले विधान केले आहे.  भारत कोणत्याही परिस्थितीत आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छिमारांच्या हिताशी तडजोड करणार नाही. या घोषणेमुळे केवळ कोट्यवधी शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासोबतच  शेती आणि ग्रामीण भारताची आत्मनिर्भरताही बळकट होईल. आम्ही या दूरदर्शी आणि शेतकरी-स्नेही विचाराचे  मनापासून स्वागत करतो आणि संपूर्ण पाठिंबा देतो. शेती, पशुधन आणि मत्स्यपालन हितासाठीची ही वचनबद्धता आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

  

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी येथे उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “येथे एक लघु भारताचे दृश्य उपस्थित आहे. मी आपल्याला प्रणाम करतो आणि येथे उपस्थित माझे ते शेतकरी बंधू, जे दिवस-रात्र मेहनत करून आज केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला अन्न पुरविण्याची क्षमता ठेवतात, त्यांना वंदन करतो. अन्न हे आपले जीवन आहे. अन्न हेच ब्रह्म आहे. शेतकरी अन्न देतो म्हणून तो अन्नदाता आहे आणि जीवन देतो म्हणून जीवनदाता आहे. एक कृषी मंत्री म्हणून मला नेहमीच असे वाटते की, शेतकऱ्यांची सेवा हीच देवपूजा आहे आणि याहून मोठी पूजा दुसरी असू शकत नाही.

शिवराज सिंह चौहान यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले की, बनावट खते   तयार करणाऱ्यांविरुद्ध सरकार लवकरच नवीन कायदा आणून कठोर कारवाई करणार आहे. पुढे त्यांनी सांगितले की, “शेतकरी कल्याणासाठी विविध योजना प्राधान्याने राबवल्या जात आहेत. कालच राजस्थानमधील झुंझुनू येथून पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विमा रकमेचे डिजिटल वितरण करण्यात आले.”

  

पुढे, केंद्रीय मंत्री यांनी पंतप्रधानांच्या राष्ट्र सर्वोपरि या संकल्पाला बळ देत सांगितले की, “पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार रद्द करणे हा एक ऐतिहासिक निर्णय होता, ज्याबद्दल आम्ही पंतप्रधानांचे आभारी आहोत.

केंद्रीय मंत्री म्हणाले की पंतप्रधानांनी नेहमीच राष्ट्रहिताचे ठोस निर्णय घेतले असून त्याबद्दल देश त्यांचा आभारी आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

एडीएद्वारे आयोजित दोन दिवसीय ‘एअरोनॉटिक्स 2047’राष्ट्रीय चर्चासत्राला बंगळुरुमध्ये प्रारंभ

एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) द्वारे आयोजित ‘एअरोनॉटिक्स 2047’या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला  बंगळुरूच्या सेंटर फॉर एअरबोर्न …