79 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा भाग म्हणून मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया परिसरात 15 ऑगस्ट, 2025 रोजी भारतीय लष्कर आणि भारतीय नौदलाच्या बँडने संयुक्तपणे सादरीकरण केले. एके काळी देशाचे औपचारिक प्रवेशद्वार असलेले, आणि 1948 साली ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी ज्या जागेवरून निघून गेली, असे ऐतिहासिक महत्व लाभलेल्या या जागेवर शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हे सादरीकरण झाले. भारताच्या वसाहतवादी राजवट, ते सार्वभौम देश बनण्याच्या अभिमानास्पद प्रवासाचा उत्सव साजरा करण्यासाठी ही जागा, योग्य पार्श्वभूमी ठरली.
वंदे मातरम, मेरा मुल्क मेरा देश, तेरी मिट्टी में मिल जावा, कंधों से मिलते है कंधे, जय भारती, कदम कदम बढाये जा आणि सारे जहाँ से अच्छा, यासारखी समर गीते आणि देशभक्तीपर गीतांच्या सुरांनी वातावरण भारावून गेले.
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देशभक्तीची भावना आणि अभिमान जागवणारा, आणि देशाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या एकतेच्या भावनेला बळकटी देणारा हा संगीताचा कार्यक्रम अविस्मरणीय अनुभव ठरला.
हा विशेष कार्यक्रम म्हणजे केवळ एक सादरीकरण नव्हते, तर सशस्त्र दलातील गणवेशधारी महिला आणि पुरुषांनी, आपण ज्या नागरिकांना सेवा देत आहोत, त्यांना मनापासून दिलेली सलामी होती. या कार्यक्रमात स्वातंत्र्याच्या भावनेचा उत्सव साजरा करण्यात आला, शहीद सैनिकांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली. युवा पिढीला एकता, शिस्त आणि राष्ट्राप्रति समर्पण या चिरस्थायी मूल्यांनी प्रेरित करण्याचा हा प्रयत्न होता.
गेटवे ऑफ इंडियाच्या आकाशात तिरंगा ध्वज फडकत असताना, सादर झालेल्या या संगीताने असे आश्वासन दिले, की भारताच्या सशस्त्र दलांचे धैर्य, त्याग आणि सेवा हा ध्वज सदैव उंच फडकवत ठेवील.
Matribhumi Samachar Marathi

