भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित पाचव्या लेखापरीक्षण दिवस सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवले.
आपल्या भाषणात त्यांनी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग ) यांचे “जनतेच्या पैशाचे संरक्षक” म्हणून गौरव करत त्यांच्या भूमिकेचे विशेष महत्त्व अधोरेखित केले. सार्वजनिक निधीचे संरक्षण, सुशासनाची सुनिश्चितता आणि लोकांचे हित जपण्यात कॅगची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, 1860 मध्ये महालेखापाल कार्यालयाची स्थापना झाल्यापासून 165 वर्षे कॅगने पारदर्शकता, जबाबदारी आणि प्रामाणिकतेचा भक्कम वारसा निर्माण केला आहे. त्यांनी नमूद केले, “जगातील सर्व सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था एकाच उद्देशाने कार्य करतात,सार्वजनिक पैसा सुरक्षित ठेवणे आणि सुशासनाला प्रोत्साहित करणे. त्यात भारताचा कॅग अभिमानाने उभा आहे.”
उपराष्ट्रपतींनी कॅगच्या अहवालांचे पुराव्यावर आधारित, वस्तुनिष्ठ आणि भारताच्या ‘नैतिक संपत्ती’चा आधारस्तंभ असे वर्णन केले.
ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारांसाठी लागू करण्यात आलेल्या “वन नेशन, वन सेट ऑफ ऑब्जेक्ट हेड्स ऑफ एक्स्पेंडिचर” या सुधारणेमुळे सरकारी खर्चात अधिक पारदर्शकता आणि तुलना शक्य होणार आहे.
त्यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याने धोका ओळखणे, प्रशासनिक कार्यक्षमता वाढवणे आणि पुराव्यावर आधारित निर्णयप्रक्रिया अधिक बळकट होईल, ज्यामुळे सार्वजनिक निधीचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर होईल.
“हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला भविष्यातील गरजांनुसार तयार असलेली आणि नागरिक-केंद्रित नागरी सेवा आवश्यक आहे.” असे ते म्हणाले.
Matribhumi Samachar Marathi

