वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू) प्रांगणात आयोजित फिट इंडिया संडेज ऑन सायकलच्या 32 व्या आवृत्तीच्या समारोप समारंभात 3000 हून अधिक लोकांनी सहभागी होऊन तंदुरुस्तीचा भव्य उत्सव साजरा केला तसेच या कार्यक्रमात अमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्ध जनजागृती करण्यात आली.

डॉ. मनसुख मांडविया यांनी देशातील तरुणांना अमली पदार्थांपासून दूर ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या तरुणांना तरुणांना सक्रीय जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केले. “निरोगी शरीरच केवळ निरोगी मनाकडे नेऊ शकते आणि निरोगी मनच केवळ देशाला विकसित भारताकडे नेऊ शकते.”, असे मांडवीय यावेळी म्हणाले.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), केंद्रीय विद्यालय संघटना, भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद (सीआयएससीई), डीएव्ही कॉलेज व्यवस्थापन समिती, नवोदय विद्यालय समिती आणि बाल भारती पब्लिक स्कूल यासारख्या अनेक शैक्षणिक संस्थांच्या भागीदारीत या देशव्यापी सायकलिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

“फिट इंडिया संडेज ऑन सायकल हा उपक्रम जनआंदोलनात (जन चळवळीत) रूपांतरित झाला आहे. आज, देशभरातील 6,000 हून अधिक ठिकाणी सर्व शैक्षणिक संस्थांनी अमली पदार्थमुक्त युवा विकसित भारत मोहिमेत भाग घेतला. तरुणांना व्यसनमुक्त करूनच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करू शकतो. या उपक्रमाद्वारे देशातील तरुण तंदुरुस्त आणि निरोगी राहावे आणि देशाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा बनावेत हा उद्देश सरकार साध्य करु इच्छित आहे,” असे डॉ. मांडविया म्हणाले.

या कार्यक्रमाला डॉ. मांडविया यांच्यासोबत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे, उत्तर प्रदेशचे क्रीडा मंत्री गिरीशचंद्र यादव हे देखील उपस्थित होते.
Matribhumi Samachar Marathi

