निवडणूक आयोग आणि भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो कार्यालयातर्फे 11 नोव्हेंबर पासून कोल्हापूर मध्ये मतदार जागृती अभियान सुरू होत आहे.
अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथून सकाळी 10:30 वाजता होईल. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या उपस्थितीत प्रसिद्धी अभियानाच्या व्हॅनला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल.
20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे.राज्यातील प्रत्येक मतदार नागरिकांनी न चुकता मतदान करावे, यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे.
राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये प्रचार वाहनाद्वारे मतदारांना अवश्य मतदान करण्याविषयी प्रोत्साहित करण्यासाठी हे अभियान राबवण्यात येईल; तसेच मतदान प्रक्रिया, मतदान केंद्राची माहिती कुठून मिळवायची, आचारसंहिता नियम, आचारसंहितेचे उल्लंघन होताना दिसल्यास कुठे तक्रार करायची, अशी सर्व माहिती दृकश्राव्य माध्यमातून देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्रातील कलावंत, खेळाडू यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे मतदारांना केलेले आवाहन एलइडी स्क्रिनच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात राज्य सरासरीपेक्षा मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या भागामधून हे प्रचार वाहन प्रवास करेल. केंद्रीय संचार ब्युरोचे लोककलावंत देखील लोककलेच्या माध्यमातून मतदारांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतील. हा उपक्रम दिनांक 11 ते 20 नोव्हेंबर दरम्यान सुरू राहील. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाचे सहकार्य मिळत आहे.
Matribhumisamachar


